Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 26 December, 2009

भाजपच्या सहकार्याने सरकार स्थापन करणार

झामुमोचा दावा
रांची, दि. २५ : शिबू सोरेन यांच्या नेतृत्वात आणि भाजप व एजेएसयु यांच्या सहकार्याने आम्ही झारखंडमध्ये सरकार स्थापन करणार, असा दावा झारखंड मुक्ती मोर्चातर्फे करण्यात आला आहे. भाजप व एजेएसयू यांनी झामुमोला समर्थन देण्याचे मान्य केले आहे, असे पक्षाचे उपाध्यक्ष हेमलाल मुरमू यांनी आज सोरेन यांच्या निवासस्थानी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले.
नुकत्याच झारखंडमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १८ तर त्यांच्यासोबत निवडणूक पूर्व आघाडी करणाऱ्या जदयुने २ जागा जिंकल्या आहेत. झामुमोने १८ जागांवर विजय मिळविला असून एजेएसयुने पाच जागा पटकाविल्या आहेत. ही नवी आघाडी झाल्यास ८१ सदस्यीय सभागृहात त्यांची संख्या ४३ होते आणि ही संख्या सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या आकड्यांसाठी पुरेशी आहे.
भाजपची रविवारी बैठक
झारखंड विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यासाठी भाजपची उद्या रांची येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, झारखंडमध्ये सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने भाजप नेत्यांनी आज चर्चा केली असल्याची माहिती आहे. निवडणूक निकालानंतर राज्य विधानसभेत निर्माण झालेल्या त्रिशंकू पार्श्वभूमीवर भाजपच्या आज झालेल्या बैठकीत माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा, प्रदेश अध्यक्ष रघुबर दास, ज्येष्ठ नेते यशवंत सिंग आणि इतर नेत्यांसोबत झारखंडमधील पक्षाचे प्रभारी उपाध्यक्ष करुणा शुक्ला उपस्थित होते.
उद्या होणाऱ्या पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ पक्ष नेत्याच्या निवडीसह सरकार स्थापन करण्याबाबतही विचारविमर्श केला जाणार आहे. या बैठकीला भाजपचे केंद्रीय निरीक्षक म्हणून शुक्ला यांच्यासह अनंत कुमार हेही उपस्थित राहणार आहेत. अन्य एका वृत्तानुसार माजी राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग हे सुद्धा बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दिल्ली येथे पत्रकारांसोबत बोलताना राजनाथसिंग म्हणाले की, आम्ही जर झारखंडमध्ये सरकार स्थापन केले तर आम्ही राज्यातील जनतेला चांगले आणि स्थिर शासन देऊ.

No comments: